एफआरपी प्रमाणे पूर्ण दर दिला, मात्र ढाण्या वाघाला कोठेही पोस्टर लावण्याची गरज भासली नाही..

लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांचे प्रतिपादन

लोकनेते साखर कारखान्याचा १९ वा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा संपन्न

मोहोळ/धुरंधर न्यूज

गत गाळप हंगामामध्ये लोकनेते साखर कारखान्याने एफआरपीप्रमाणे २१५० रुपये प्रतिटन दर दिला असून यासह १ एप्रिल नंतर प्रोग्रॅमपेक्षा उशिरा गाळपास आलेल्या उसास प्रतिटन १५० रुपये प्रमाणे दर देणार असून हे करत असताना मोहोळ तालुक्याच्या या ढाण्या वाघाला कोणत्याही गावातील चौकात पोस्टर लावण्याची अथवा प्रसिद्धी करण्याची गरज भासली नसल्याचे सांगून कामगारांना तीन महिन्याचा पगार बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी केले.

लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याचा १९ वा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा प्रांताधिकारी गजानन गुरव व त्यांच्या पत्नी सुवर्णा गुरव यांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार यशवंत माने हे होते. यावेळी चेअरमन बाळराजे पाटील हे बोलत होते.

यावेळी माजी आमदार राजन पाटील, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे, संचालक प्रकाश चवरे, मदनसिंह पाटील, अशोक चव्हाण, शुक्राचार्य हावळे, संदीप पवार, संभाजी चव्हाण, सभापती रत्नमाला पोतदार, दूध संघाच्या संचालिका वैशाली शेंबडे, नानासाहेब डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना चेअरमन बाळराजे पाटील म्हणाले की, कोणतेही कर्ज न घेता माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ १२५० प्रतिदिन मेट्रिक टन गाळप क्षमतेचा साखर कारखाना ५ हजार ५०० मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमतेपर्यंत कारखान्याचे विस्तारीकरण केले असून यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व कामगारांची मोलाचे योगदान आहे. यावर्षीच्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली असून कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपासाठी यंत्रणा सज्ज झाले असल्याचेही चेअरमन बाळराजे पाटील यांनी सांगितले.

यावेळी बोलताना प्रांताधिकारी गजानन गुरव म्हणाली की, माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन बाळराजे पाटील यांच्या कार्यकुशल कर्तृत्वाने लोकनेते साखर कारखान्याची प्रगती असल्याचे दिसून येत असून कर्जमुक्त कारखाना ठेवून सभासद, कामगारांच्या हितासाठी घेतलेले निर्णय वाखानण्याजोगे असल्याचेही यावेळी गुरव यांनी सांगितले.

आमदार यशवंत माने यावेळी बोलताना म्हणाले की, साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांना अनेक बँकांच्या तसेच प्रमुख नेत्यांच्या दारात कर्जासाठी हेलपाटे मारताना पाहिले आहे, मात्र लोकनेते साखर कारखाना मात्र एकमेव असा साखर कारखाना आहे की, अनेक बँका कर्ज देण्यासाठी पाठीमागे असतात. माजी आमदार राजन पाटील, चेअरमन बाळराजे पाटील व अजिंक्यराणा पाटील यांच्या कुशल नेतृत्वाने लोकनेते कारखान्याची यशस्वी घोडदौड असल्याचेही यावेळी आमदार यशवंत माने यांनी सांगितले.


यावेळी तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे यांनीही आपले विचार व्यक्त केले.

यावेळी हनुमंत पोटरे, शिवाजी सोनवणे, रवींद्र देशमुख, उदय गायकवाड, ओमप्रकाश जोगदे, चंद्रहार चव्हाण, महेश पवार, हरिश्चंद्र अवताडे, ज्ञानेश्वर चव्हाण, अस्लम चौधरी, हरिश्चंद्र चवरे, भाऊसाहेब सलगर, बबन गोडसे, बाळासाहेब शेळके, भीमराव जरग, देविदास देवकते, सज्जन पाटील, नागेश साठे, रामदास चवरे, वैभव गुंड पाटील, सज्जन चवरे, दयानंद राऊत, हेमंत गरड, आण्णा बंडगर, दादा बोडके, सचिन चव्हाण, अमोल शिंदे, नारायण गुंड, भारत जाधव आदिंसह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते सभासद व कामगार उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. सत्यवान दाढे यांनी तर आभार प्रकाश चवरे यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *